कपालभाती प्राणायाम : कपाल म्हणजे कपाळ; भाती म्हणजे तेजस्वी किंवा ओजस्वी. म्हणजेच कपालभाती म्हणजे तेजस्वी कपाळ. कपालभाती हा प्राणायाम करताना शरीरातील सर्व संस्थांची सफाई म्हणजेच प्रक्षालन होते. ओजस्वी कपाळ हे उत्तम आरोग्याचे प्रतिक म्हणता येईल. ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामुळे केवळ वजन कमी होते, असे नाही, तर संपूर्ण शरीर संतुलित राहते.
असा करावा हा प्राणायाम :
सर्वप्रथम सुखासनात बसावे. पाठीचा कणा ताठ असावा. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला उघडून गुडघ्यांवर ठेवावेत. आता एक दीर्घ श्वास घ्यावा आणि उच्छवासाच्या फटकाऱ्याने श्वास बाहेर सोडावा. श्वास सोडताना प्रत्येक वेळी शक्य तेवढे पोट आत घ्यावे. नाभीला पाठीच्या कण्याकडे ओढून घ्यावे. पोटाच्या स्नायूंची हालचाल लक्षात येण्यासाठी एक हात नाभीवर ठेवावा व नाभी आतल्या बाजूस ओढून घ्यावी. या प्रक्रियेत एकदा श्वास घेतल्यानंतर परत श्वास केवळ बाहेरच सोडायचा आहे. पुन्हा श्वास घ्यायचा नाही. जसे जसे ओटीपोट आणि नाभीकडचा भाग सैल सोडला जाईल, तशी फुफ्फूसात हवा आपोआप शिरेल.
घ्यावयाची काळजी :
हृदयविकार असल्यास, अथवा पेस-मेकर बसवला असल्यास, स्लिप-डिस्कमुळे पाठदुखीचा त्रास असल्यास, पोटाची एखादी शस्त्रक्रीया झाली असल्यास, हार्नियाचा त्रास असल्यास हा प्राणायाम करू नये. या प्रकियेत ओटीपोटाचे स्नायू पिळवटून निघतात, त्यामुळे गरोदर महिलांनी आणि मासिक पाळी सुरू असल्यास कपालभाती प्राणायाम करू नये. उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असलेल्यांनी योग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा प्राणायाम करावा.
प्राणायामाचे फायदे :
कपालभाती प्राणायामामुळे खाल्लेल्या अन्नाची उर्जेत रुपांतर करण्याची क्षमता व गती वाढते. यामुळे वजन नियंत्रणात राहते. शरीरातील सूक्ष्म नाड्यांची शुद्धी होते. पोटाचे स्नायू उत्तेजित होतात, ज्याचा लाभ मधुमेहींना होतो. रक्ताभिसरण वाढते आणि चेहऱ्याची कांती वाढते. पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते. पोट सुडौल राहते. मज्जासंस्था उर्जित होते व मेंदूच्या पेशींना चालना मिळते. मन शांत व हलके होते.